Tuesday, March 30, 2021

साहेबाची बदली

साहेब हा एक भटका प्रवर्ग आहे( Gypsy). साहेबाची इच्छा असो अथवा नसो,ठरलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर शासन  बदली करणारच! एकीकडे शासन स्थलांतर थांबविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असताना साहेब कम्युनिटीला असं  जाणीवपूर्वक शासन निर्णय काढू काढू भटकं  करणं कितपत योग्य आहे?( साहेबांचं काम नाही पण किमान त्याच ठिकाण बदलून तरी साहेबाला फ्रेश करावं असा शासनाचा इरादा असावा!)सोयीच्या ठिकाणी बदली झाली नाही तर साहेबाला बरीच भटकंती करावी लागते. भटकंतीचे  दोन  तीन प्रकार आहेत. काही साहेब सहकुटुंब भटकंती करत फिरतात मग बदली कुठं का होईना. काही साहेब कुटुंब एका ठिकाणी ठेऊन स्वतः भटकत असतात, हे साहेब मुख्यालयातून शुक्रवारी दुपारी गायब होऊन सोमवारी दुपारपर्यंत मुख्यालयी प्रकट होतात. काही गृहप्रेमी साहेब शंभर दीडशे किलोमीटर दररोज  भटकून भटकून   घरी येतात, असले साहेब सकाळी 11:00 वाजता ऑफिस ला पोहचून सायंकाळी 4:00 वाजता ऑफिसमधून गायब होतात, या साहेबांची अर्धी जिंदगी प्रवासात बरबाद होते! (शिवाय प्रवासाने मणक्याच्या त्रास वगैरे हे सर्व additional benefits)...पण असो...

      साहेबाची टर्म पूर्ण होत आलेली असते बदलीचे वेध लागलेले असतात. काही साहेबांच्या अवगुणांमुळे किंवा  अतिचांगुलपणामुळे  त्यांची 'अवकाळी'  बदली सुद्धा होते. आता  बदलीचे दिवस तथा काहींच्या कंगालीचे दिवस तथा काहींचे सुगीचे दिवस जवळ येत असतात. साहेबांचं मन काही ऑफिसात रमत नाही(अगदी नेहमीप्रमाणेच!). जवळपास गेल्या तीन वर्षांपासून साहेबाचे त्याच्या कर्मचाऱ्यासोबतचे संबंध चांगलेच दृढ झालेले असतात.    कर्मचाऱ्यांचे लग्न, बारसे, वाढदिवस, जागरण गोंधळ , कंदूऱ्या ला जाऊन जाऊन साहेबाचे असे संबंध तयार झालेले असतात की  कर्मचाऱ्यांची चूक झाली असेल तरीसुद्धा साहेब कारवाई पण करू शकत नाही! साहेबांचा resistance पार संपलेला असतो! प्रकरण किती पण किचकट असलं तरी  नाय व्हय करीत शेवटी कोंबडा मारावाच लागतो.काही काही साहेब शेवटी शेवटी ओव्हर संपत आल्यामुळे स्कोर वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. त्यातली त्यात  शेवटचे सहा महिने तर साहेब सगळ्यांना काही पण  आश्वासन देत सुटतो, शंभर टक्के करून देतो ,नक्की करतो, थोडे दिवस थांबा, मी आहे ना चिंता करू नका वगैरे वगैरे. साहेबाच्या डोक्यात एवढंच की बदली होईपर्यंत चालढकल करायची आणि मग एकदाच सुटायचं!(बदली नाही झाली तर मात्र काय खरं नाही).  थोडक्यात बदली ही सुद्धा साहेबाची गरजच असते. काहींना मात्र आत्ता आहे ते ठिकाण चांगलंच 'मानवलेल' असतंय त्यामुळे ते टर्म संपली तरी तिथंच पाय रोवून बसण्यासाठी प्रयत्न करतात. काही साहेब जास्त भानगडीत न पडता कुठं तरी side posting ला बसून पेन्शन मिळण्याची वाट पाहत बसत असतात( फिल्ड वर काम केल्यावर पेन्शन मिळणं अवघड असतंय हे त्याना कुणीतरी सांगितलं असावं!! DCPS वाले पेन्शन ची  पण वाट पाहू शकत नाही!).
बरं बदली काय अशीतशी होत नसते. मुळात ते सुद्धा एक स्किल आहे. काही काही साहेब ज्यांच्यात हे स्किल नसतंय ते आयुष्यभर महाराष्ट्राच्या कडाकाठानेच भटकंती करत  राहतात. म्हणजे एकदा सिंधुदुर्ग की लगेच थेट गडचिरोली की लगेच नंदुरबार पुन्हा यवतमाळ अशा पद्धतीने.. जिकडे फेकील तिकडे!!!  काही काही साहेब मात्र दरवेळेस 'सोयीच्या आणि सायीच्या ' ठिकाणीच, एकदम reservation करून ठेवल्यासारखं!  काही साहेब नुसते वरच्या कार्यालयात(म्हणजे कुठे समजून घ्या) हेलपाटे मारतेत, तिथं  जातेत पण काही मेळच लागत नाही, मेळ लागला तरी 'समीकरण' न जुळल्यामुळे   संध्याकाळी ट्रेन पकडून गप   माघारी येतात. काही साहेब बदलीविषयी कोणाशीच काही बोलत नाही(एकदम आतल्या गाठीचे), कुठून सेटिंग लावली याची पण चर्चा करत नाहीत, एकदम सोंबडीत कार्यक्रम करून टाकतेत!  काही साहेब तर कहरच!! ते जिथं बदली पाहिजे तिथे प्रत्यक्ष मोक्यावर जाऊन स्थळनिरीक्षण करून येतात, सगळं 'व्यवस्थित' आहे ना याची सखोल चौकशी करून मग आकडा लावतात.(जनरली साहेब एवढा अभ्यास कधीच करत नाही!).काही साहेब मोठे वजनदार लोकं यांच्याशी 'बळच' जोडलेल्या संबंधाच्या आधारे याच पत्र घे,त्याच पत्र घे..आजारी नसलेल्याना बळच 'गंभीर' आजारी पाडून त्याच सर्टिफिकेट जोडून.... शर्तीचे प्रयत्न..पण तेवढ्यावर काय काम होत नाही!!
सगळे 'योग' जुळून आल्यावर एकदाची बदली होते! काही महाराष्ट्राच्या कडाकाठाने, काही सायीच्या  आणि सोयीच्या पोस्टिंग ला,  काही घराच्या जवळ वगैरे वगैरे. काहींच सगळं व्यवस्थित करून पण ऑर्डर मध्ये नावच नसतंय, यांची अवस्था बघण्यासारखी  असते!! 
आता साहेबांच मन एकदम कोऱ्या पाटीसारख झालेल असतंय, किमान जिथून चाललाय तिथलं तरी तो टेन्शन घेत नाही! साहेब जर अवघड क्षेत्रात काम करत असेल तर त्याला कार्यमुक्त होण्याचं challenge पार करावं लागतं,  त्यासाठी सुद्धा बराच आटापिटा करावा लागतो(काही unskilled  साहेब अवघड क्षेत्रात अडकून सेवानिवृत्त सुद्धा तिथंच होतात!). एकदाचा साहेब तिथून कार्यमुक्त होतो!
गेले तीन वर्षे साहेब जरी कुटुंबापासून दूर असला तरी तो सगळ्या कर्मचाऱ्यांना आपलं कुटुंब   समजून काम करत असतो. साहेबाला बऱ्याचदा त्याच्या व्यस्त कामकाजामुळे नातेवाईकाच्या लग्नाला, कार्यक्रमाला जायला जमत नाही मात्र साहेब हा कर्तव्यस्थानी सगळ्या कर्मचार्यांच्या सुखदुःखात सामील होतो. साहेबाच्या अडचणीच्या काळात सुद्धा हीच मंडळी घरातल्या मानसासारखी उभी असतात! साहेब आयुष्यभर हीच माणसं जोडत चालतो, हीच खरी साहेबाची कमाई !!(बाकी कमावलेले पुढच्या पिढीला ऐश करायला!!) कित्येक साहेबाच्या पोरांच्या लग्नात नातेवाईक कमी आणि हीच 'कुटुंबातील' मानस जास्त दिसतात(ही शंभर टक्के वस्तुस्थिती आहे). हे सर्व सोडून जाताना कोणत्याही साहेबाचे पाय जड होतात, कार्यालयातुन जरी साहेब कार्यमुक्त झाला तरी कर्मचार्यांच्या ऋणातून तो कधीच कार्यमुक्त होऊ शकत नाही!! साहेबांवर जीवापाड प्रेम आणि आदर असलेल्याना तर साहेबाची बदली पचविणे चांगलंच जड जात...
आता या 'भटक्याला' आपला पाल उचलण्याची वेळ आलेली असते. नवीन पोस्टिंग च्या ठिकाणी पाल कुठं मारायचा ते पुढचे 'कुटुंबीय' ठरविण्याच्या कामाला कधीच लागलेले असतात.आता साहेब पुन्हा एकदा नवीन ठिकाणी 'नवीन साहेब' होण्याच्या तयारीत रवाना होतो...मग पुन्हा बदली... पुन्हा तेच.... क्रमशः
© गोविंद  खामकर

Monday, March 22, 2021

फील्ड कर्मचारी आढावा बैठक

    साहेबाची मीटिंग  वरचा साहेब कशी घेतो ते  आपण पाहिलच आहे.. पण साहेब जेंव्हा त्याच्या फील्डवरील कर्मचाऱ्यांची मीटिंग  घेतोती  फारच रंगतदार असते....!!

एक तर साहेबाने मीटिंग लावलीरे लावली की त्याच दिवशी नेमकं साहेबाला VC असणारवरचा साहेब मीटिंग लावणारप्रोटोकॉल असलं काहीतरी लफडं मागे  लागणार! अस दोन तीन वेळा मीटिंग  रद्द होऊन एकदाचा मुहूर्त लागतो...

मीटिंग ची वेळ सकाळी 10:00 वाजता...पण 11:00 च्या आत कुणिच येणार नाही!!. साहेब पण नाही!( तसं तर साहेबाला वेळेवर मीटिंग सुरू करण्याची तीव्र इच्छा असते पण वेळेवर कुणी येतच नाही तर साहेब एकटा येऊन काय करणार?).  मग कुठं तरी खालचे कर्मचारी यायला सुरुवात होणार पण ते सुद्धा मीटिंग  हॉल  ची ऍलर्जी असल्यासारखे बाहेरच इतर अशासकीय विषयावर गप्पा मारत निवांत बसणार.  थोडक्यात जोपर्यंत साहेब मीटिंग हॉल ला येणार नाही तोपर्यंत हे अजिबात मीटिंग ला बसणार नाही( नेमकं साहेब हे आहेत की मी असं साहेबाला वाटून जात!). बरं हे खालचे कर्मचारी मीटिंगला  काय माहिती घेऊन येतात हा संशोधनाचा विषय होऊ  शकतो! काही काही प्रतिभावान  कर्मचारी तर हातात काहीच आणत नाहीत!

 मग मीटिंगला सुरुवात होते.  साधारणपणे पन्नास ते साठ टक्के उपस्थिती पाहिल्यावर साहेब चिडचिड करणार.. मग खालचे कर्मचारी त्यांच्या कर्मचारी सवंगड्यांना फोन करून  बोलावण्याचा प्रयत्न करणार..नेमकं मीटिंगच्या दिवशीच दहा वीस टक्के लोक त्यामध्ये कोण आजारी पडणार( अगदी planning करून)कोण लग्नालाकोण साखरपुड्यालाकोण  अत्यंत जवळच्या पाहुण्याच्या मयतीला तर कोण दहाव्यालाकोण मिटींगला येताना गाडीवरून पडणार  वगैरे वगैरे कारणं शोधून गायब. काही तर नेहमीप्रमाणे काहीच न सांगता गायब! नेहमी गायब असणाऱ्याना साहेबाने  स्वतःच्या समाधानासाठी  2-3 नोटीस दिल्यावर ते एकदा मीटिंग ला येतातसाहेब खुश होतो पण पुढच्या मीटिंग ला ते पुन्हा गायब! .. एक तर साहेबाला त्याच्या साहेबाने मीटिंग मध्ये झापझाप झापल्यामुळे साहेबाला पण त्याच्या खालच्या कर्मचाऱ्यांची मीटिंग एकदम कडक घ्यायची इच्छा असते पण  पाच पंचवीस टक्के  लोक  गैरहजर  असल्यामुळे  साहेबाचा प्लॅन fail जातो. मागच्या मीटिंग ला कोण कोण गैरहजर होत ते साहेब रागाने विचारतो पण ते कर्मचारी या मीटिंगला सुद्धा गैरहजर असतात त्यामुळे साहेब हा विषय इथंच सोडून देतो!(साहेबाला वाटतं विषय वाढवला तर बाकीच्यांना लक्षात येईल की साहेब नुसता दम देतो ,कारवाई काहीच करत नाही  व त्यांचा पण confidence वाढून जे मीटिंग ला येतात ते  पण मीटिंग ला यायचं बंद करतील!).   

तरीसुद्धा साहेब एकदम कडक सुरुवात करतो! मीटिंग ला येताना साहेब अहवाल घेऊन यायला सांगतो पण जोपर्यंत साहेब विचारत विचारत नाही तोपर्यंत त्याच्या पिशवीतून ते काय बाहेर निघत नाही! मग साहेबाने सांगितल्यावर त्यातले निम्मे अर्धे अहवाल देतात...  पण साहेबाला मात्र सगळ्या लोकांचा म्हणजे जे मीटिंग ला आले नाही त्यांचा अथवा जे मीटिंगला येऊन पण अहवाल देत नाहीत त्या सगळ्यांचा अहवाल मात्र  वरच्या साहेबाला द्यावाच लागतो(खालचे कर्मचारी गैरहजर राहतातवेळेवर येत नाही ही कारणे  खालचा साहेब वरच्या साहेबाला तर सांगूच शकत नाही!!).. मग साहेबाला असाच काहीतरी आकड्याचा झोल करून वरच्या साहेबाला द्यावा लागतो(साहेबाची अस करण्याची इच्छा नसते पण साहेबांचा नाईलाज असतो). साहेबाला 50 ते 60 विषयाचा आढावा घ्यायचा असतो पण एवढ्या लोकांचा पहिल्या विषयाचा आढावा घ्यायलाच पहिला तास दीड तास जातो. काही तंत्रस्नेही साहेब थोडस चांगलं planning करून projector वर सुद्धा मीटिंग घेण्याचा प्रयत्न करतो पण हे नाटक थोड्याच दिवसात बंद पडत. पहिल्या विषयाचा आढावा तसा कडक होतो. हॉल मधील वातावरण थोडंफार तापलेल असतंय .त्यात पुन्हा निम्म्या लोकांची उत्तर दोन दिवसात करून घेतो, online केलंय पण दिसत नाही वगैरे वगैरे( वरच्या साहेबाला साहेब असलीच उत्तर देतो ही सवय साहेबाला इथूनच लागते).मग साहेब त्यांना ओरडतो हे अस चालणार नाहीमी कारवाई करील वगैरे वगैरे.

या पहिल्या एक दीड तासात साहेबाला अतिशय गंभीर मुद्रा धारण करावी लागते कारण साहेब नुसता थोडं हसला तरी मीटिंग मधला दम निघून जातो.  एवढं सगळं सुरू असताना उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची  हळूहळू आवक सुरू असतेच(संघटनेला वाहून घेतलेले बहुधा उशिरा येतात). साहेब त्यातल्या काहींवर चिडतो पण मीटिंग च्या मूळ विषयाची link तुटते त्यामुळे साहेब उशिरा येणाऱ्याला हटकायच पण सोडून देतो! तसं तर सगळेच उशिरा येतात पण नेमकं किती वाजताच्या नंतर आलं म्हणजे उशिरा समजायचं हा यक्षप्रश्न कधीच सुटत नाही...  मग दुसरा विषय ..त्याच्यात पण हीच अवस्था ...मीटिंग  कितीही विषयावर असली तरी खालच्या कर्मचाऱ्याकडे  तेच कागदतीच डायरी( काहींना एक डायरी पाच पाच वर्ष संपत नाही!) . काही विचारलं की  तेवढेच दोन पान उचकायचे काही तरी फेकायचंसगळा  वेळ मारून न्यायचा कार्यक्रम !! (अगदी साहेबासारखंच) . साहेब त्यानी सांगितलेलं कुठं तरी लिहून घेतो जे त्याला पुन्हा कधीच सापडत नाहीपण सगळं नोंद घेतल्यासारखं दाखवावं लागतं.  या खालच्या कर्मचार्यांचा basic problem हा असतो की ते नाही कशालाच म्हणत नाहीत आणि करत पण  काहीच नाहीत !  अशा पद्धतीने  पहिल्या एक दोन तासात 2-3 विषय संपत नाही तोच जेवणाची वेळ होते.  मग जेवणाची सुट्टी!! अर्धा तासाची सुट्टी म्हणजे सगळ्यांनी एक तास गृहीत धरलेला असतोच! त्यात पण साहेबावर विश्वास असलेले तथा साहेबाची पोथी ओळ्खलेले    दुपारीच गायब होतात. 

 मग पुन्हा बैठक सुरू होतेसाहेब meeting ला आल्यानंतर मग लोक मीटिंग ला बसून घ्यायला सुरुवात करतात. काही VIP कर्मचारी तर थेट दुपारच्या सत्रातच meeting ला येतात!!  मग अजून फार तर 2-3 विषयावर आढावा होतो(आढावा काही पण असोउत्तर ठरलेलीच..दोन दिवसात करतो वगैरे वगैरे..).. आता  मीटिंगला बऱ्यापैकी पठारावस्था प्राप्त झालेली असते..सगळ्या विषयात अतिशय सुमार दर्जाचा परफॉर्मन्स असल्यामुळे उर्वरित विषयातील कोणता विषय आधी घ्यावा ते साहेबाला समजत नाही. तरी पण  आळीपाळीने झपाझापिचा कार्यक्रम सुरूच असतो. त्यातली त्यात प्रोटोकॉलकमिटी असल्या कार्यक्रमात 'सहकार्यन करणार्यांना साहेब जरा जास्तच झापतो(दुसरं  करणार तरी काय?...)

बरेच विषय आढावा घ्यायचे बाकी असतातओरडू ओरडू साहेबाचा घसा दुखायला लागतो... पण विषय संपतच नाही... मग शेवटी बैठक आटोपती घ्यावी लागते..बहुतांशी विषयाला हात पण लागलेला नसतो...एवढा वेळ बैठक घेऊन साहेबाला मात्र समाधान वाटत नाही पण इलाज नसतो. उर्वरित विषय साहेब अक्षरशः फक्त वाचून दाखवतोआता ह्या राहिलेल्या विषयात खालचे काय दिवा लावणार ते साहेबाला माहितीच असतंय तरी साहेब भोळी अपेक्षा ठेऊन सूचना देत असतो...सायंकाळी  पाच साडेपाच वाजता  बऱ्यापैकी   चुळबुळ सुरू होते... घरी जायची घाई!!  साहेब सोडून शक्यतो कोणी मुख्यालयी  राहत नाही कारण मुख्यालयी फक्त साहेबानेच राहायचं असतंय हे ठरलेलं! कारण बाकीच्या  सर्वांना चांगल्या सोयीसुविधा पाहिजे असतात त्या मुख्यालयी असतीलच असे नाही... पण साहेब बिचारा adjust करून घेतो! अशा प्रकारे मीटिंग ची सांगता होते.. खालच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तथा फेकलेल्या आकड्यांच्या आधारे साहेब त्याचा report तयार करतो...तेच वरच्या साहेबाला फेकतो... असच वरचा साहेब पण..

 

गोविंद खामकर

Saturday, March 20, 2021

कमिटी

 आज काल प्रशासकीय कामकाज करताना साहेबाच्या मागे किती कामे असतात ते तर आपण पाहतच आहोत(आणि साहेब त्यातली किती करतो ते पण!). पण एवढ्यावर साहेबाला सोडील ते शासन कुठलं.. साहेब वर्षभर राबता राबता ज्या विविध योजना राबवतो  त्याच मूल्यमापन अथवा फलश्रुती तपासण्यासाठी शासनस्तरावरून वेगवेगळ्या कमिटी फिल्डवर भेटी देत असतात. एक तर शंभर  रुपयांची योजना राबवताना ज्या दोनशे अटींचे पालन करावे लागतेत्यामध्ये साहेब आणि यंत्रणा पूर्ण बेजार होते,  तरीसुद्धा कामात  काहीतरी चुका राहून जातातच....

असंच एखादं पत्र येऊन पडतकमिटी येणार(सहाजिकच हे पत्र whatsapp वरच!!)साहेबाच्या दृष्टीने कमिटी म्हणजे घरच झालं थोडं अन... पण असो.  यंत्रणा कामाला लागते(म्हणजे यापूर्वी अगदीच काम करत नव्हती अस नाही!). तसे कमिटी हा प्रकार नेहमीचाच असल्याने साहेब आणि त्याची यंत्रणा या कामात सराईत(सराईत शब्द  जरा  जड वाटेल पण राहुद्या आता!) झालेले असतात. कमिटी direct  राज्य सरकारला अथवा  विभागाला reporting करणार आहे असलं काहीतरी वरचे साहेब सांगत असतातपण हे नेहमीचंच असल्याने साहेब त्याच जास्त tention घेत नाही . कमिटी येणार म्हणलं तर सगळ्यात आधी साहेबाच्या डोक्यात काय येत असेल तर यावेळी कमिटीचे 'नियोजनकोणाच्या गळ्यात मारायचं! मग मागच्या वेळी हे नियोजन कोणी केलं होतं किंवा हे करण्यास कोण 'सक्षमआहे या बाबींचा अभ्यास करून साहेब कोणाच्या तरी गळ्यात हे 'नियोजनमारून टाकतो!! काही कर्मचारी नियोजन म्हणलं की दूरदूर पळतातअसले कर्मचारी  साहेबाला अजिबात आवडत नाहीत. किंबहुना असले कर्मचारी साहेबाच्या 'चांगल्याकर्मचाऱ्याच्या व्याख्येत बसतच नाही! कमिटीच सगळं 'नियोजनव्यवस्थित करा असा निरोप वरचा  साहेब आवर्जून देऊन मोकळा होतो. या नियोजनाला विशेष अशी तरतूद नसतेच.वरच्या साहेबाला विचारलं तर ते सांगणार ते तुमच्या 'लेव्हलला करून घ्या... एवढ्या वर्षात हे 'लेव्हलनावाच लेखशीर्ष कुठंच सापडलं नाहीतरी पण होऊन जातं सगळं! (आता हे कसं होतं याची चर्चा इथं नकोच!).  जे  साहेब प्रशासनात नवीन नवीन आलेले असतात त्यांना हे'नियोजनलवकर कळत नाहीते वरच्या साहेबाला अजून खोदूखोदू विचारतातमग वरच्या साहेबाची पण अडचण होते!! मग वरचा साहेब थेट खालच्या साहेबाच्या खालच्या कर्मचाऱ्याला संपर्क करून योग्य ते 'नियोजनकरण्यास सांगतो..  त्यामुळे नवीनच प्रशासनात आलेल्या  साहेबाला  कमिटीच प्रकरण जरा जडच जात कारण  साहेबाला प्रशिक्षण संस्थेत शिकवलेले तत्वज्ञान  आणि हे कमिटीच प्रकरण यांचा दुरान्वयेही संबंध नसतो.  त्यात वरचा साहेबच जर प्रशासनात नवीन तथा interview mode मधून बाहेर आलेला नसेल तर तो खालच्या साहेबांकडे आलेल्या कमिटीच्या भानगडीत अजिबात पडत नाहीतसेच खालचा साहेब हे सगळं कसं manage करतो हे पण त्याला विचारत  नाही( हे पारदर्शक प्रशासनाच्या तत्वात कसं बसत ते वरच्या साहेबलाच माहीत). कमिटी  नेमक्या कोणत्या गावांना भेट देणार ते शक्यतो आधीच ठरलेल असतंय.. गावातील लोक कसे आहेतगावातील कर्मचारी कसे आहेतगावातील कामाचा दर्जागावातल्या भानगडीतक्रारकर्तेराजकीय गटतट , 'सहकार्याची भावनाइत्यादी parameter पाहून गावे final केलेली असतात... मग कोणती कमिटी आली की त्याच गावात!!! दुसऱ्या गावांना संधीच(की शिक्षा?) नाही! अगदी दुष्काळ पाहणीसाठीएखादी  कमिटी आली आणि तिला सगळ्या रस्त्याने सगळया गावांमध्ये जरी  नुसता फुफाटा आणि कुसळच दिसली तरी पण साहेब रिस्क  घेत नाही,त्या कमिटी ला पण नेहमी ठरलेल्याच गावात नेणार!...show fail नाही झाला पाहिजे ही प्रामाणिक भावना!! 

एकदाची कमिटी गावात येते.. साहेब आणि यंत्रणा वाटच पाहत असतात  (नाईलाजाने पण आतुरतेने).कमिटी आल्याबरोबर गावात   जमलेले तथा वैतागलेले लोक  त्यांचं स्वागत करतात. याकामी शक्यतो  एका शिक्षकाची नेमणूक केलेली असते(तो पण ठरलेलाच). तो शिक्षक कमिटीच स्वागत करण्यापूर्वी थोडी गावातील इकडची तिकडची माहिती सांगतो. मध्ये मध्ये दोन चार शेर ट#2335;ाकतो त्यातली त्यात  'यु ही पंख होणे से कूच नही होताहौसलो  से उडान होती है!हे तर famous!(अतिशय संदर्भहीन पण सगळे  गप ऐकून घेतात कारण Timepass करणे हा मूळ हेतू). नंतर हार तुरे देऊन फोटो बिटो काढून मग फील्ड visit कडे रवाना... तिथं पण तेच ठरलेले  दोन चार  'पोपटलाभार्थी... काही पण  फेकतेत...हे लाभार्थी काय फेकणार हे त्या समितीतील दोन चार टाळके सोडले तर सगळ्यांना पाठ झालेलं असतंय. या गावात साहेबाने राबविलेल्या योजना प्रचंड यशस्वी झालेल्या असतात!(बाकीच्या गावात काय झालं ते साहेबाला निवांत विचारा!). एखाद्या योजनेमुळे तर एखाद्या  शेतकऱ्याचं आयुष्यच बदललेलं असत...त्याच उत्पन्न एवढं वाढलेल असतंय की कमिटीमधील एखाद्या सदस्याला frustration येतंय मी शेतकरी असतो तर किती  बरं झालं असत!  त्यात एखादा कमिटी सदस्य सल्ला देणार की तुम्ही जे पिकवत आहात ते तुम्ही डायरेक्ट एखाद्या मॉल सोबत tie up करून अजून दोन चार  पट कमवू शकता(हा सल्ला सगळेच कमिटी वाले देत असतात). साहेब पण मग  जणू त्या कमिटी सदस्याने गुरुत्वाकर्षणचा शोध लावल्यासारखा impress झाल्याच दाखवतो(तस हे ऐकून ऐकून साहेबाचे कान पिकलेले असतात).एखादा कमिटीतील सदस्य तर input output च समीकरण सगळ्यांसमोर मांडतोआपण खर्च कसा कमी करू शकतो याबद्दल माहिती देतो.. सगळे impress झाल्यासारख दाखवतात...एखाद्या योजनेमुळे त्या गावात   सुरुवातीला पावसाळ्यात पण पाणी नसायचं आता उन्हाळ्यात पण फुल्ल पानी...सगळे impress... सगळीकडे असंच.. नुसती फेकफेकी... कमिटी शासकीय घर मिळालेल्या लाभार्थी ला विचारणार नवीन घरात गेल्यापासून आपला अनुभव काय... मग लाभार्थी म्हणणार fresh वाटतंयबरं वाटतंयपोराचं लग्न होत नव्हतं आता जुळलंय.. पण कमिटी च एवढ्यावर समाधान होत नाही.. मग लाभार्थी सांगणार पाहिले आम्हाला दररोज साप चावायचे आता कधीकधीच चावतात वगैरे वगैरे....

एखाद्या कमिटी सदस्याला या गावात राबविलेल्या योजना खूपच आवडताततो लगेच साहेबाला यावर  success story बनवायला सांगतोसाहेब पण नक्की नक्की म्हणून म्हणून होकार दर्शवतो... पण Success story दिली की ते गाव पहायलाअजून  कमिट्या येणार हे साहेबाच्या डोक्यात पक्क असल्यामुळे साहेब या भानगडीत पडतच  नाही. सगळ्याच साहेबांचा याबाबत awareness वाढल्यामुळे आता शासनाने   बऱ्याच योजनांमध्ये suuccess story सुद्धा compulsory सादर करण्यास सांगितले  आहे! मग ती success story उत्कृष्ट ठरली तर अजून रिस्क वाढते त्यामुळे ती शक्यतो थातुरमातुर प्रकारची केली  जाते... 

त्यानंतर कमिटीला  परिसरातील एखाद  प्रसिद्ध देऊळ त्यांना दाखवायचं. काही कमिटी सदस्य तर फक्त देव देव करायला कमिटीत हिंडतेत का ते पण कळत नाहीकारण ते बाकी कशातच interest दाखवत नाही... देवदर्शनामुळे कमिटीला पण कामात काम झाल्यासारखा वाटत(साहेबाला कामात बिनकामच काम  आल्याचं समाधान वाटतं!).  एकदा मी कमिटीतील एका सदस्याला म्हटलो की इथल्या देवाच्या पाया पडलं तर घरात भांडण होत नाहीत्याचा दोन तास तिथून पायच निघेना... असो. कमिटी ची इच्छा असो अथवा नसो तिथं आरती वगैरे करायचीच ,timepass जास्तीत जास्त करायचा हे धोरण. 

नंतर जेवणाचा कार्यक्रम...त्यासाठी साहेबाची काही यंत्रणा इकडे कार्यरत असते. ही मंडळी या कामात अनुभवी असल्याने सारख ते त्यांच्याच गळ्यात येत..हे काम जर व्यवस्थित झालं तर कमिटी नाराज होण्याची जास्त शक्यता असतेत्यामुळे हा कार्यक्रम व्यवस्थित होणे गरजेचे असते. त्या ठिकाणी जे जेवण मिळत तेच त्या परिसरातल best आहे असा कमिटीचा समज तयार केला जातो. मग अशा प्रकारे कमिटीला नमस्कार करून  राम राम केला जातो( पुन्हा येऊ नये या अपेक्षेने!) . मग साहेबाला त्या गावातील लोक विनंती करतात साहेब पुढच्या वेळेस दुसरं गाव बघात्या गावात काम करणारे कर्मचारी तर पार  वैतागून गेलेले असतात ,  ते पण सांगतात साहेब दुसरं  गाव घ्या पुढच्या वेळेस...!! साहेब नुसताच हो हो म्हणतो .....मग थोडे दिवस जातात... मग दुसरी कमिटी.. तेच गाव.. तेच लाभार्थी... तेच देऊळ..

गोविंद खामकर

Wednesday, March 17, 2021

कार्यशाळा

नुसतं कार्यशाळा शब्द ऐकला तरी  कोणत्यापण साहेबाला गुदगुल्या झाल्यासारख वाटत! ह्या शब्दातच जादू आहे...जर  पत्रामध्ये चुकून 'कार्यशाळा आणि आढावा बैठक असा शब्दप्रयोग आला तरी साहेबाला करमत नाही!! फक्त कार्यशाळा पाहिजेआढावा नकोच(साहेब मीटिंग मध्ये आढावा कसा देतो ते माहितीच आहे!).कार्यशाळेच्या नावाखाली आढावा घेणार्यांना तर  साहेब कम्युनिटी कधीच माफ करणार नाही...!!  कार्यशाळा घेण्याचा शासनाचा उद्देश एखादे अभियान समजावून सांगणेत्या  राबविताना येणाऱ्या अडचणी सोडविणे इत्यादी असला तरी साहेबाचा प्राथमिक आणि अंतिम  हेतू दिवसभराच्या ऑफिसच्या कटकटीतून मुक्त  होण्याचा असतो.. नुसतं कार्यशाळेच पत्र अथवा निरोप आला तरी साहेबाचे दोन तीन दिवस खूपच आनंदात जातात.. काही काही साहेब कार्यशाळेच्या आधल्या दिवशीच  कार्यशाळेच्या  ठिकाणी सर्व "नियोजनाच्या" तयारीने पोहचलेले असतात. कार्यशाळेला जाताना साहेब कोणतीच माहिती सोबत नेत नाहीफार तर साहेबासारखं दिसावं म्हणून  एखादी डायरी(न उघडण्याच्या अटीवर) सोबत घेतो. कार्यशाळा घेणारा पण शेवटी साहेबच असल्याने त्याला हे खालच्या साहेबाचे गुण माहीत असतात,   त्यामुळे तिथं एखादा पेन( शक्यतो रुपयांच्या आतील)एखादं फोल्डर माहितीपुस्तिका(साहेब असलं कधी वाचणार!) असलं तिथं गेल्यागेल्या हातात ठेवल जात. कार्यशाळेला पोहचल्यानंतर साहेब त्याच्या इतर साहेबमित्रांना भेटतोचहापाणी करता करता कार्यशाळेचा मूळ विषय सोडून इतर सर्व विषयावर चर्चा करतो..मग कार्यशाळेच्या हॉल मध्ये प्रवेश केल्यावर साहेब त्याचे दोन चार जोडीदार पाहून  शक्य तेवढं stage पासून लांब बसण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपापसात मनमोकळेपणाने चर्चा करता येईल. हॉलमध्ये सजवलेलं स्टेज, background ला सुरू असलेले instrumental  music,   मोठा प्रोजेक्टर इत्यादी पाहून साहेबाला अजून प्रसन्न वाटतं. नंतर मोठे मोठे 2-4 साहेब येतातत्यांचा  त्यांच्यातली त्यांच्यातच  एकमेकांचा बुके देऊन सत्कार केला जातोसाहेब पण  फुल energy ने टाळ्या कुटतो. स्वागत आणि प्रस्ताविक शक्यतो एखाद्या अशासकीय निवेदकाकडे असतेशासकीय साहेब  हे काम करण्यासारखे कालांतराने   राहत नाहीत!  नंतर कार्यशाळेच्या मूळ विषयाकडे वळताना प्रोजेक्टरवर presentation द्वारे  विषय समजून सांगितला जातो,पण साहेबाचा काही समजून घेण्याचा मुडच नसतोच!! (हे presentation सुद्धा बहुदा त्या अभियानासाठी नेमलेला कंत्राटी  staff करत असतो. असंही प्रशासनात हे कंत्राटीच करत आहेतबाकी शिपायापासून तर साहेबापर्यंत सगळेच साहेब !!). त्यातली त्यात जर presentation सुरू असताना चुकून  light गेली, mike बंद झाला, जो presentation करतोय त्याला एखादा फोन आला वगैरे असं काही घडलं तर साहेबाची भावमुद्रा वरकरणी गंभीर दिसत असली तरी आतून मात्र सुखद लाडू फुटत असतात... Presentation मध्ये  काही साहेबांनी योजना राबविताना ज्या success story तयार झालेल्या असतात त्या सर्वांना दाखवल्या जातातत्याच presentation एवढं छान केलेलं असतंय की प्रत्यक्ष ते काम केलेला साहेब पण confuse होतो की हे नक्की मीच केलंय का.!! नंतर हे अभियान राबविताना आपल्याला कोणत्या activities करायच्या आहेत, record कसं ठेवावं लागेलकोणाची काय जबाबदारी असेल , data entry कशी करावी लागेलते करताना काय काळजी घ्यायची कोणत्या अडचणी येऊ शकतात या सर्व बाबींवर चर्चा केली जाते पण हे सगळं साहेबाच्या डोक्यावरून जात असतंय! साहेब विचार करतो हे मला का सांगत आहेतमाझ्या खालच्या कर्मचाऱ्यांना यांनी training द्यायला पाहिजेसगळं काय साहेबानी बघायचं का?  एकंदरीत आतापर्यंत सगळंच डोक्यावरून गेलेलं असतंयपण साहेबाला त्याच्या खालच्या कार्यक्षम कर्मचाऱ्यांवर विश्वास असतोसाहेबाचे कर्मचारी  कार्यशाळेला न येतासुद्धा हे नक्की करू शकतात याची साहेबाला खात्री असते. कार्यशाळेमध्ये साहेबाच मन काही लागत नाहीपण सगळं समजल्यासारखं आणि अगदी मन लावून ऐकल्यासारखी acting मात्र करावीच लागते.त्यातली त्यात जर साहेबाची जागा stage पासून जरा जास्तच जवळ असेल तर साहेबाला कार्यशाळा असून पण दिवस वाया गेल्यासारखा वाटतो!त्यातली त्यात जर साहेबाचा साहेब सुद्धा कार्यशाळेला उपस्थित असेल तर साहेबाला अजून जबाबदारपणे ही acting करावी लागते! तसही  मधे मधे आत बाहेर  येणे जाणे हा timpass चालू असतोचअधून मधून मोबाइल चाळने चालूच असते. ऑफिसच्या  कामासंदर्भात  बरेच फोन नेहमीप्रमाणे चालूच असतात पण साहेब कार्यशाळेच्या नावाखाली कोणालाच दाद देत नाही.. जरा वजनदार माणसाचा फोन असला तरी फोन उचलून अगदी हळू आवाजात सांगणार(जरी मोठ्याने बोलणे अथवा बाहेर जाऊन बोलणे शक्य असले तरीही!) मीटिंग मध्ये आहे,आणि फोन कट करून टाकणार. Stage वरचा एखादा साहेब पण कार्यशाळेच्या मुख्य विषयाला हात न घालता(मोठया साहेबाला पण विषय कितपत समजलेला असतो यावर भाष्य नकोचपण साहेब असल्यामुळं जमून जातंय!) फक्त एवढंच  सांगतो की  आपण काम खूप करतो पण ते data entry करत नाही , online करत नाही  त्यामुळे आपला performance कमी दिसतोहे वाक्य प्रत्येक कार्यशाळेत ठरलेलंच...या वाक्याला खाली बसलेले सगळे साहेब अशी  दाद देतात जणू काही हे सगळं काम 100 टक्के करून बसले फक्त online करायचं राहील!! हे सगळं करता करता साहेबाच्या पोटात कावळे ओरडायला लागलेले असतात आणि मार्गदर्शन करणारा काहीतरी न समजणार सांगत सुटलेला असतो. तो मार्गदर्शन करणारा खाली बसून पुन्हा एखादा नवीन माणूस  मार्गदर्शन करायला उठला तर मात्र साहेबाची अक्कल जाते...काही हुशार संधीसाधू साहेब   Lunch break होण्यापूर्वीच  जेवणाला सुरुवात करतात.   साहेब पण कार्यशाळेच्या दिवशी dieting वगैरे च्या भानगडीत न पडता जेवणावर तुटून पडतो. जेवणानंतर कार्यशाळेच रूप बघण्यासारखं असतं... निम्मे अर्धे शिस्तप्रिय साहेब जेवण केल्याबरोबर गायब होतात.. उरलेले पण हॉल मध्ये जाऊ का नकोनाही गेलं तर काय होईलगेलो तर निघता येईल का,  खूप वेळ बसावं लागेल का या विचाराने ग्रासलेले असतात. कार्यशाळा घेणारे पण सगळ्यांना बसून घ्या बसून घ्या आपण लगेच संपून टाकू अस प्रलोभन देत असतात पण साहेब लोक लवकर दाद देत नाहीत.. एकंदरीत सगळेच ढेपाळलेले असतात.. कसातरी कार्यक्रम सुरू असतो..मग presentation दाखवणारा  कसं तरी presentation पळवत पळवत कडेला न्यायचा प्रयत्न करतो..  आता परिस्थिती कोणाच्याच नियंत्रणात  राहिलेली नसते. हा अटीतटिचा क्षण साधून कार्यशाळेची  सांगता केली जाते!! जर चुकून एखाद्या साहेबाला विचारलं की नेमकं काय शिकवलं कार्यशाळेतत्याची विकेट गेलीच म्हणून समजा. कार्यशाळा संपल्याबरोबर साहेबाला  मुक्त झाल्यासारख वाटत... इथून पुढंचा सगळा 'कार्यक्रममात्र  ठरल्याप्रमाणे होतो... काही काही कर्तव्यदक्ष साहेब आजचा दिवस 'गेलाया नकारात्मक भावनेने मार्गस्थ होतात  तर ओरिजनल साहेब आजचा दिवस 'निघालाया सकारात्मक भावनेने मार्गस्थ होतात....पुढच्या कार्यशाळेची वाट पाहत.... क्रमशः

( ' *साहेब* series मधील 'प्रशासनातील कोंबडशाहीशिपाईसाहेब,  नवीन साहेबसाहेबाची मीटिंगमामाच पत्र हरवलंकार्यशाळा... क्रमशः)

*©* गोविंद खामकर

 


Sunday, March 14, 2021

मामाचं पत्र हरवलं...

शासनामध्ये टपालातुन पत्र वेळेत येईल असे कोणत्याच साहेबाला  वाटत नाही..हे एकमेकांच्या  कार्यक्षमतेवर आणि कर्तव्यतत्परतेवर असलेल्या प्रचंड विश्वासाच प्रतीक आहे.. सामान्यपणे एखाद पत्र साहेबाला त्या पत्राचा उगम झाल्यापासून पंधरा  दिवसांनातर हातात येत... त्या पत्रात लिहिलेले असतंय तीन  दिवसात अहवाल सादर करावाविलंब झाल्यास सर्वस्वी जबाबदारी आपली राहीलकिंवा हे अतिशय गंभीर आहेआपण व्यक्तिशः लक्ष घालावेतक्रार होणार नाही याची दक्षता घ्यावी,अर्जदाराला  परस्पर तुमच्या स्तरावरून कळून टाकावे इकडे कळवू सुद्धा  नये वगैरे वगैरे.....आता पत्रच  15 दिवसांनी आल्यावर कधी अहवाल आणि कधी कार्यवाही  ..असो.  एरव्ही ही तर  फॅशनच झाली आहेसर्वस्वी जबाबदारी आपली राहील हे प्रत्येक पत्रात नमूद असतंय.. हे असले पत्र  काढनाऱ्या साहेबांवर नेमकी कोणती जबाबदारी असते ते पण पाहिलं पाहिजेकारण नुसते पत्र काढायला शक्यतो शासन एवढा पगार देणार नाही असं वाटतं(देऊ पण शकतत्यात काय एवढं)!! 

एखादं पत्र वरच्या साहेबाच्या ऑफिसमधून  type झाल्यापासून तर ते Target तथा  खालच्या साहेबाच्या हातात(कार्यलयात नाही!!)  पडेपर्यंतच प्रवास फारच रोमांचक असतो... या पत्राचा प्रवास टपाल कक्षातील  अतिकार्यक्षम कर्मचार्यांमुळे अजून खडतर होतो!! एक तर ते पत्र type करणारा दिवसभरात एकच पत्र करतो.. इतर उर्वरित तथा फावल्या वेळात 5-25 चहागप्पाटप्पा फरकइनक्रिमेंटशेती,प्लॉटिंग आणि इतर राष्ट्रीय विषयावर चर्चा.... मग ते पत्र साहेबाच्या टेबल वर 2-4 दिवस कोंबड्याच्या प्रतीक्षेत!! 

साहेबांच्या कोंबडा तथा स्वाक्षरी झाल्यानंतर पुन्हा त्याच्यावर जावक नंबर टाकून अथवा असाच  फेकून ते टपाल  कक्षात जाणार.... साहजिकच टपाल कक्षात   त्यावर प्रचंड विचारमंथनचर्चाआणि अंतिम  निर्णय घेणे  ही खूपच किचकट प्रक्रिया असल्याने या ठिकाणी घाई करून जमतच नाही!!!  या ठिकाणची छोटीशी चूक सुद्धा परभणीचे पत्र जर्मनीला पाठवू शकते वगैरे वगैरे....त्यात पुन्हा टपाल कक्षातील कर्मचारी हे अतिशय सामाजिक बांधिलकी जपणारे  असल्याने त्याना सर्व वाढदिवस,  आजारी पाहुण्याला भेटायला जाणेमित्राच्या मुलाला मुलगी पाहायला जाणेसुपारीसाखरपुढेदहावेसदिच्छा भेटीदेवदर्शननवसचुलत मेहुण्याच्या चुलत सासुच्या चुलत पोराचं लग्न वगैरे वगैरे  हे अटेंड करावेच लागतात. त्यामुळे त्या पत्राला तिथून निघण्यास उशीर झाला तर त्यात एवढं काय नवल आहेत्यानंतर ते  पत्र खालच्या ऑफिस च्या शिपाईसाहेबांच्या प्रतीक्षेत ... खालच्या ऑफिस चे शिपाई साहेब त्यांच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून ते पत्र खालच्या साहेबाच्या टपाल कक्षात पोहच करतात... साहजिकच इथे सुद्धा अत्यंत अनुभवी (काहींनी तर आयुष्य टपाल कक्षात काढलय!)  दद्धाचार्यांच्या हातून ते थोडंच अस न तपासता जाणार आहे!!!

तिथं त्याची आवक रजिस्टर ला सांकेतिक  भाषेत( ही एक आवक जावक कक्षातील code language आहेही जो लिहितो त्यालाही शक्यतो वाचता येत नाहीबाकीच्यांचा तर विषयच नाही!! ) नोंद घेऊन ते पुढे साहेबांकडे जायला तयार...मग कार्यालयातील एखादा कर्मचारी ते पत्र marking करून(खरं तर पत्र साहेबाने मार्क केलं पाहिजे पण... साहेब..शेवटी साहेबच!!.. आता अजून काय बोलणार!) पुढे त्यासंबंधी टेबल वर शिपाईसाहेबामार्फत पाठवतो...एवढं सगळं systematic  जंजाळ असताना पत्र उशिरा पोहचणे  समजू शकतो पण पत्र न सापडणे हा गंभीर प्रकार शासकीय कार्यालयात नेहमीचाच.!!.. मी काही दिवस मंत्रालयात काम केलं तिथपासून तर फील्डवरील सगळ्या कार्यालयात हीच बोंब.... साहेबाकडे येणारे अभ्यागत तथा पत्रकारलाभार्थीकार्यकर्ते,  कार्यालयाच्या अवती भवती कायम पडीक दिसणारे एखादा कागद घेऊन येतातत्यावर साहेबाच्या कार्यालयाची पोहच असते...साहेबाने तो कागद पाहिलेला नसतोच(अगदी नेहमीप्रमाणे!)..मग साहेब संबंधित टेबल वरच्या कर्मचाऱ्याला बोलावतो... साहजिकच नेहमीप्रमाणे  तí#2379; पण म्हणतो त्यानेही तो कागद पाहिलेला नाही...मग कागद गेला कुठं??  साहेब चिडचिड करायला लागतोतस सगळे तो कागद सापडवण्याचा प्रयत्न करतात अथवा किमान तस भासविण्याचा तरी प्रयत्न करतातकागद  काय सापडत नाही.... बरं हे  नेहमी असंच!!!

पण साहेबाला काय मेळ लागत नाही कागद जातेत तरी कुठं!! कधी कधी तर साहेबाला वाटत सरसकट सगळ्यांच्या सोनोग्राफया तरी करून पहाव्या कोण कागद खात बित तर  नाही ना हे तर समजेल!!..... पण आता साहेबाने याला तोडगा काढला...जो व्यक्ती ती पोहच घेऊन येतो त्याचीच झेरॉक्स काढायची आणि तिथून पुढे त्या कागदावर काम सुरू करायचं(हे तत्व मंत्रालयापासून तर सगळ्यात खालच्या ऑफिस पर्यंत लागू आहे हे मी अत्यंत जबाबदारीने सांगतोय)!! 

पण आता लोक पण हुशार झालेतते पत्रावर पोहच घेऊन दिवसांनी माहिती अधिकारात विचारतात की अमुक अमुक तारखेला दिलेल्या अर्जावर केलेल्या कार्यवाहीचा तपशील द्यावा. मग आता काय शोधणार... कुठं  शोधणार...शोधून तरी काय होणार...!!!

...बरं  ज्या पत्रांचा उगम साहेबाच्या ऑफिस मध्ये होतो तिथं पण तीच बोंब!! जर साहेबाला असं वाटलं की एखादा फील्ड वरील कर्मचारी कामाकडे फारच दुर्लक्ष करतोय(थोडफार  चालतय!) तर साहेब त्याला नोटीस काढतोपण नोटिसला उत्तर सुद्धा येत नाहीमग साहेब दुसरी नोटीस काढतोतिला पण उत्तर येत नाहीसाहेबाला त्या कर्मचाऱ्याच्या मुजोरपणाचा खूप  राग येतो मग साहेब प्रथेनुसार तिसरी आणि अंतिम नोटीस काढतो( तीन नोटीस देण्याची प्रथा आहेनियम नाही)...पण त्याला पण उत्तर नाही... त्यांनतर 2-3 दिवसांनी योगायोगाने नोटीस दिलेला कर्मचारी दुसऱ्या  कामानिमित्त साहेबांकडे येतो... साहेबाला तो एकदम chill दिसतोनोटिसचा लवलेशसुद्धा चेहऱयावर नाही!!! मग साहेब आवक जावक विभागातील तज्ञ कर्मचाऱ्याला बोलावतो.... तिन्ही नोटीस त्याच्याकडेच पडलेल्या!!!!  बरं त्याला बोलून काय फायदा.. तो बऱ्याच वर्षांपासून अध्यात्माच्या मार्गावर घसरलेला असल्याने कमालीची स्थितप्रज्ञता त्याच्या अंगी असतेकाही बोलाफरकच नाही..असो!!

हे झालं कागदी घोड्यांचं..

Email च तर लै अवघड...इकडचे म्हणणार पाठवलातिकडले म्हणणार आला नाही... मग एकच तोडगा...पुन्हा पाठवा!!...मग  येतो बरोबर.!!...हे कसं काय होत ते त्या सुंदर पिचाईलाच माहिती..आम्ही असलं एकदा Engineering च्या पहिल्या वर्षात 2006 साली केलं होतंफोन करून विचारल होत email आला का... पण 2021 मध्ये तरी हे थांबलं पाहिजे!!.....

लहानपणी एक खेळ खेळायचो..... मामाच पत्र हरवलं... ते कोणाला सापडलं....आता समजतंय तो मामा साहेब होता!!!!

 

 

(काही शासकीय कार्यालयातील कर्मचारी  टपाल कक्षामध्ये अत्यंत चांगलं काम करीत आहेतकाही ठिकाणी ई टपाल पद्धती  सुद्धा चांगल्या पद्धतीने राबविली जात आहे..हे लिखाण अगदी अपवादात्मक अनुभवावर आधारित आहेजरी कोणाला वाटलं की हे माझ्या ऑफिसशी match होतंय त्यांनी सुधारणा करावीइलाज नाही)

 

 

गोविंद खामकर

Wednesday, March 10, 2021

साहेबाची मीटिंग

        साहेबाच्या मागे भरपूर मिटिंग.. ...कामाच्या व्यापामुळे  काही मीटिंग साहेब विसरून जातो.....साहेबाच्या  खुर्चीच्या समोरच्या फळ्यावर पुढच्या  मीटिंग  ,कार्यक्रम वगैरे लिहिण्याची फॅशन  साहेब जॉईन  झाल्यापासून 5-6 दिवसात बंद पडते.

मीटिंग चा agenda येऊन पडतो... मरणामातीचे विषय... नेहमीप्रमाणे agenda आल्यानंतर तयारीला सुरुवात! मागची मीटिंग झाल्यापासून महिनाभर  पाट्या टाकणे भानगडी सोडविणेकुटाने मिटविणे,आंदोलनउपोषण,   आमदारमंत्रीउदघाटन प्रोटोकॉल ,कमिट्यादुष्काळपूरपाणी पाऊसधंदापाणी,   पार्ट्या अध्यात्म  वगैरे यातच गेला... मग मिटिंगसाठी कर्मचारी  कसले तरी report आणून टाकतेतकाही बिचारे  तर आकडे बदलायची पण तसदी  घेत नाहीत ,काही अंदाजेच आकडे हाणून टाकतेत...काही काही विषय तर फक्त साहेबालाच   माहीत असतात... त्याचा बाकीच्या स्टाफ ला गंध पण नसतो!! शेवटी जमेल त्या पत्रावळ्या  बांधून घेऊन साहेब मीटिंग ला निघतो...मीटिंग सुरू होण्यापूर्वी साहेब डायरी उचकुन बघतोसाहजिकच ती मागच्या मीटिंग नंतर थेट आजच उचकलेली असते!! साहेबाला वाटत जरा 2-4  दिवस आधी  डायरी उचकुन बघितलीअसती  तर जरा बरं झालं असतं.... मीटिंग सुरू होते...

मग एका एका विषयाच्या आढाव्याला सुरुवात होते. मीटिंग घेणारा साहेब मुद्देसूद मीटिंग घ्यायला लागला तर मग खालच्या साहेबांच्या फ्युज उडायला सुरुवात होते.. एक तर मिटींगला आणलेल्या पत्रावळ्यामध्ये जे  पाहिजे ते सोडून बाकी सगळं सापडतं!! साहेबाने काही विचारलं की नुसते पानं  चाळायचे...काही सापडणार नाही हे माहिती असतंय तरी acting करायची!!..नाहीतर गुपचूप चोरासारखं इकडं तिकडं बघून खाली  वाकून संबंधित कर्मचाऱ्याला फोन करून   आकडे माहिती घेण्याचा प्रयत्न चालू असतो पण त्याचा फारसा उपयोग होत नाही!!आढावा घेणारा साहेब विचारत असतो अमुक विषयात आपला performance खूपच खराब आहे( तसा सगळ्याच विषयात खराबच असतो!!) तर आपला साहेब सांगणार साहेब आम्ही सगळं नियोजन केलेलं आहेसगळ्यांना सूचना दिल्या आहेतबऱ्यापैकी काम झालं आहेथोडंच राहील आहे, 100%  करून घेतो असली काहीतरी मोघमछाप उत्तरे देण्याचा कार्यक्रम चालू असतोपण याच साहेबाला जेंव्हा याचे  फिल्डवरील कर्मचारी असली मोघम उत्तरे देतात तेंव्हा ती त्याला मुळीच आवडत नाहीत!!!

त्यात पुन्हा आढावा घेणाऱ्या साहेब आणि आढावा देणारा साहेब यांचे आकडे एकमेकांशी कधीच जुळत नाहीतआणि हा जर विषय  वेळीच गांभीर्याने घेतला नाही तर अजून किमान 50 वर्ष ह्या दोघांचे आकडे जुळण्याची सुतराम शक्यता नाही( शासनाने यासंबंधी एखादा अभ्यासगट नेमण्याची गरज आहेपण त्या अभ्यासगटामध्ये पुन्हा असलेच साहेब घेणे कटाक्षाने टाळले पाहिजे!). बरं आकडे जुळले नाही की  साहेब सांगणार आम्ही online केलं होत पण दिसतच  नाही, technical problem आलाअपलोड झालं नाहीकस काय दिसेना तेच समजेना असल्या दयनीय ,केविलवाण्या ,कालबाह्य कारणांचा आधार घ्यायला सुद्धा साहेब मागे पुढे पाहत नाही.

प्रत्येक विषयाच्या आढाव्यात हेच.. करून घेतोघेतो करूनपाहून घेतोलक्ष घालतो(एवढ्या दिवस लक्ष कुठं होत हे विचारायचं नाही!)वगैरे वगैरे....

बऱ्याच विषयांबाबत साहेब बिनधास्त सांगून टाकतो दोन दिवसात करून घेतो... अख्खा महिना गेला तेंव्हा याला जमलं नाही आणि आता दोन दिवसात काय तिर मारणार ते साहेबाला माहिती...हे असले बरेच विषय दोन दिवसात संपवतो म्हणणाऱ्या सुपरमॅन साहेबांची कार्यक्षमता तपासण्यासाठी एकदा आढावा घेणाऱ्या साहेबाने यांची तिसऱ्या दिवशी मीटिंग घेतलीच पाहिजे!! त्याशिवाय ही दोन दिवसात करून घेतो म्हणण्याची अनिष्ट प्रथा समाप्त होणार नाही... पण आढावा घेणारा साहेब पण यांची कार्यक्षमता तपासण्याची रिस्क घेत #2344;ाही(शेवटी तो पण साहेबच!!)...

काही विषयामध्ये शून्य कामगिरी असते पण एखादा साहेब अमुक करताना तमुक technical problem येतो असं काहीतरी खुसपट काढतो ...वरच्या साहेबाला पण काय समजत नाही.. मग वरचा साहेब  पण वेळ मारून नेण्यासाठी म्हणतो ठिक हेदोन दिवसात करून घ्या... त्यामुळे बाकीच्या साहेबांवर आलेली संक्रात टळते...

एवढं सगळं होऊन एखादा तरी विषय असा असतो की त्यात साहेबाचा performance बाकीच्यांपेक्षा जरा  बरा असतो पण नेमकं त्याच  वेळी आढावा घेणारा साहेब म्हणतो मी काय आज या  विषयाचा आढावा घेत बसणार नाहीजे राहिले त्यांनी लवकर विषय संपून टाका!! आता सांगा साहेबानी  करायचं तरी काय....

प्रत्येक विषयाचा आढावा घेताना साहेब नमूद करतो की या विषयाचा वरच्या पातळीवरून प्रचंड फॉलोअप  सुरू आहेतमला स्वतःला showcause नोटीस आली, DO आला वगैरे.... थोडक्यात आढावा घेणाऱ्या साहेबाच्या म्हणण्याचा मथितार्थ असा की मला नका घाबरू पण किमान माझ्या वरच्या साहेबाला तरी घाबरून काम होईलपण त्याचा विशेष उपयोग होत नाही!!

असे प्रत्येक विषयामध्ये साहेबाची विकेट जात जात मीटिंग संपण्याची वेळ झालेली असते. एव्हाना  सगळ्या साहेबाना बायकांचे (स्वतःच्या) फोन  सुरू झालेले असतातजेवायला येणार का वगैरे वगैरेआढावा घेणाऱ्या साहेबाला पण फोन येत असतो पण तो बायकोचा फोन आहे असं समजू नये म्हणून त्याच्या वरच्या  साहेबाला बोलल्याची acting करतो.. काही अतीऍक्टिव्ह साहेब घरून निघतानाच आज उशीर होणार अस सांगून पुढचं 'नियोजनकरून मीटिंगला  निघतात.....मीटिंग सुटल्या सुटल्या कुजबुज सुरू होते लै काम  आहे राव आपल्याला ,कस एवढं manage करायचं वगैरे वगैरे...मग सगळे साहेब मार्गस्थ होतात... काही श्रमपरिहारस्थळाकडे तर काही  घराकडे... पुन्हा एकदा नव्या उमेदीने... पुढच्या मीटिंग ला चांगली तयारी करू असा निश्चय करून.... पण पुन्हा पुढच्या मीटिंग ला तीच बोंब... बदलीपर्यंत तेच...बदली झाली तरी तेच

 

 गोविंद खामकर

Thursday, March 4, 2021

शिपाई साहेब

 राहुरीचा गुरुवारी बाजार!!! ऑफिस मध्ये फुल्ल गर्दी!! त्यात आज कालच्या नोकऱ्यांमध्ये मिटिंग, VC, आढावेचौकशाउपोषण,आंदोलन,बहिष्कार, ,प्रोटोकॉल,पंचनामेपोस्टिंग  आणि कोंबडे हाणून हाणून साहेब पार बेजार झालाय. एवढं सगळा राडा  चाललेलं असताना कार्यालयातील शिपायाला  पाहून  साहेबाला   साहेब होण्याचा निर्णय घेऊन चुकल्यासारखं वाटत!!

शिपायाला ना मीटिंग ना भानगडीत्याला ना प्रोमोशन ची चिंता ना डीमोशनच भीतीब्रह्मदेव आला तरी त्याच डीमोशन करू शकत नाही!!चांगलं काम केलं तरी शिपाईचखराब केलं तरी शिपाईच! बदली झाली तरी काम तेचकारवाई करायची झाली तरी जबाबदारी  नसलेल्यावर कोणती जबाबदारी निश्चित करायची?? निलंबन केलं तर लगेच दुसरा नगाला नग कुठून आणायचा ?? 

बरं तुलनाच करायची झाली तर   शिपाईसाहेबांच्या   पगारापेक्षा साहेबांचं पगार दुप्पट पण नाही. कार्यालयात १४ हजारावर १४  तास काम करणारे  -४ कंत्राटी कर्मचार्यांचा एकत्रित पगार शिपायाएवढा!! एखाद्या खाजगी company मधल्या  अर्ध्या साहेबांचं पगार सुद्धा सिनियर शिपाईसाहेबापेक्षा कमीच!! बरं  काम काय तर साहेबांनी गंठी वाजवली तर ह्याला त्याला बोलविणे(ते पण साहेब ऑफिसात असला तर!!,साहेबाने वाजवलेल्या प्रत्त्येक घंटीमागे  साधारणपणे १०० रुपये शासन शिपायाला देत असेल!!!), थोडं फार टपाल इकडे तिकडे नेणे साफसफाईच काम यांनी बऱ्यापैकी Outsource केलेलं आहे ....

त्यात पुन्हा साहेबांचा शिपाई म्हणलं तर त्याला साहेब सोडून बाकीचे शक्यतो दुसरे कोणी काम सांगत नाही. साहेबांचे आणि शिपायाचे कसलेही संबंध असले तरी साहेब शिपायच सगळं ऐकतो(तस तर साहेब सगळ्यांचंच ऐकतो!!) हे बाकीच्या स्टाफ च्या डोक्यात फिट असतंय....त्यामुळे तो साहेबांचा शिपाई असला तर बाकीच्यांचा तो साहेबच असतो. त्यामुळे शिपायांमध्ये पण साहेबांचा शिपाई ही क्रिम पोस्टिंग आहे.

दिवसभर निवांत ,शांत चित्ताने संध्याकाळी 6:00 वाजायची वाट बघत शिपाई राहू शकतो . ना शुगर ना बीपी... (साहेबांची sugar लेवल  म्हणजे साखर कारखाना टाकता येईल  एवढी)... नंतर अवांतर उद्योग करायला मोकळा. एकदा त्यानी कार्यालय सोडलं की त्याला कोणी फोन पण करत नाही आणि केला आणि त्यानी उचलला नाही तरी पण साहेब त्याच विशेष काही करू शकत नाही!! आयुष्यात अजून काय पाहिजे....

  शिपाई पदाच सर्वात जास्त आकर्षण कोणाला असेल तर त्याच्या साहेबाला!! बरेच साहेब ज्यांना बाकीच्या गोष्टीत लै interst नाही ते साहेबाच्या पगारात शिपायचे काम करू शकतेतपण तशी offer त्यांना कोणी देत नाही....बर साहेबाला शिपाई होण्याचं  सुख पाहिजेच असलं तरी साहेबांचं किती demotion केल तरी त्याला शिपाई कोणी करणार नाही!!

त्यामुळे आयुष्यात योग्य वेळी योग्य निर्णय घेणे फार महत्वाचे आहेआपली एखादी चूक सुद्धा आपल्याला शिपाई न करता साहेब बनवू शकते जे आयुष्यभर भोगावे लागते.....

म्हणूनच शिपायांचा साहेब होण्यापेक्षा साहेबांचा शिपाई म्हणजेच शिपाईसाहेब व्हा!! आपलं आयुष्यच बदलून जाऊ शकते...

 

- गोविंद खामकर

Monday, March 1, 2021

प्रशासनातील कोंबडशाही

 

काल राहुरीतील एक पत्रकार सांगत होता  गेल्या 5-10 वर्षात प्रशासन फार गतिमान झालंय ...पण त्याला या गतिमानतेची मूळ मेख माहीतच नाही.....त्याला तरी कसं कळणार!! ही  प्रशासन तथा कोंबडशाहीतील गोपनीयता टिकवण्यासाठी हा कोंबड्यांचा खेळ office copy वर असतो,कार्यालयातून बाहेर जाणाऱ्या प्रतीवर नसतो!!

प्रशासनात काम करताना एक सामान्य आणि सर्वमान्य गैरसमज असा असतो की  खालच्याना वाटत वरचे सगळं तपासतात आणि वरच्यांना वाटतं खालून सगळं  तपासूनच आलंय!! ह्या  एकमेकांवरील दृढ (अंध) विश्वासावरच  प्रशासन खऱ्या अर्थाने गतिमान होतंय...साहेब खालच्या कर्मचाऱ्याला चार चार वेळा विचारतो बरोबर केलंय नाकाही चुकीचं तर नाही नानक्की ना etc... पण साहेब वाचायची ' Risk' घेत नाही...नियम कायदे वाचायला या गतिमान प्रशासनात वेळच नाही... त्यामुळे बहुतेक वेळा common (non)sense  वरच  कार्यक्रम चालू असतो...पण यामध्ये सही तथा स्वाक्षरी  तथा  कोंबडा याचा  फार महत्वाचा रोल असतो. साहेबाच्या सहीच्या शेजारी छोटे छोटे दोन चार कोंबडे असल्याशिवाय साहेबाला सही करायला comfortable वाटतच नाही.  याठिकाणी साहेबांची ती सही आणि बाकीच्यांचा  तो कोंबडा ही धारणा पक्की आहे....

बाकीच्यांचे कोंबडे साहेबांच्या शिक्क्याच्या शेजारी गर्दीतदाटीवाटीतवाकडेतिकडे उभे असतात आणि साहेबांचा कोंबडा ऐटीत मोरासारखा शिक्यावर बसलेला असतो. साहेबाला खालच्या कोंबड्यावर कितीही  विश्वास असला तरी वेळ आल्यावर खालचे कोंबडे नेमके कुणाचे हे cocktail ( cocktail शब्दाचा उगम इथंच असावा!!)समजतच नाही आणि ऐटीत  बसलेल्या साहेबाच्या कोंबड्यामुळे साहेबांचा कार्यक्रम होतो. पण गतिमान प्रशासनात असल्या तुश्च विचारांना थारा नाहीच....त्यात एखादे  प्रकरण जरा अवघड  दिसलं की साहेबाच्या खालचे  एक तर कोंबडा हानीत  नाहीत आणि हाणला  तर त्याची size पार सेंटीमीटर वरून मिलीमीटर वर आणतेत.....पण साहेबाच्या कोंबड्याला लपायची सोय नाहीच.....

कालांतराने अनुभवातून(कोंबडे  हाणण्याच्या) साहेबांचं confidence वाढत जातो आणि तो बाजूला कोंबडे आहेत की नाही ते पण बघत नाही.....मग साहेब खऱ्या अर्थाने गतिमान प्रशासनाचा जनक होतो.. साहेबाचा table कधी पण मोकळाचकर्मचारी कागद घेऊन येतो की लगेच साहेब पण शिक्का दिसला की हान कोंबडा....... ह्या गतिमानतेमुळे साहेबाच्या खालची मंडळी जॅम खुश असते. साहेबांनी सही करताना लै बारीक पाहिलं की ते कुणालाच आवडत नाही. त्यामुळे सवंग लोकप्रियतेसाठी सुद्धा साहेब पटापट कोंबडे हाणतो.  

  ....ह्या गतिमान प्रशासनाच्या राड्यात साहेबाच्या 'सहीचाकधी कोंबडा होतो ते कळतच नाही.... आणि चुकून गटारी आली तर कोंबडा मात्र साहेबाचाच कापला जातो....

 

 

-          श्री. गोविंद खामकर

प्रोटोकॉल

लेख 25 वा: प्रोटोकॉल ( 'साहेब सिरीज मधील यापूर्वीचे सर्व 24 लेख https://gamatijamati.blogspot.com या लिंक वर उपलब्ध आहेत) प्रोटोकॉल ह एक...