एक तर साहेबाने मीटिंग लावलीरे लावली की त्याच दिवशी नेमकं साहेबाला VC असणार, वरचा साहेब मीटिंग लावणार, प्रोटोकॉल असलं काहीतरी लफडं मागे लागणार! अस दोन तीन वेळा मीटिंग रद्द होऊन एकदाचा मुहूर्त लागतो...
मीटिंग ची वेळ सकाळी 10:00 वाजता...पण 11:00 च्या आत कुणिच येणार नाही!!. साहेब पण नाही!( तसं तर साहेबाला वेळेवर मीटिंग सुरू करण्याची तीव्र इच्छा असते पण वेळेवर कुणी येतच नाही तर साहेब एकटा येऊन काय करणार?). मग कुठं तरी खालचे कर्मचारी यायला सुरुवात होणार पण ते सुद्धा मीटिंग हॉल ची ऍलर्जी असल्यासारखे बाहेरच इतर अशासकीय विषयावर गप्पा मारत निवांत बसणार. थोडक्यात जोपर्यंत साहेब मीटिंग हॉल ला येणार नाही तोपर्यंत हे अजिबात मीटिंग ला बसणार नाही( नेमकं साहेब हे आहेत की मी असं साहेबाला वाटून जात!). बरं हे खालचे कर्मचारी मीटिंगला काय माहिती घेऊन येतात हा संशोधनाचा विषय होऊ शकतो! काही काही प्रतिभावान कर्मचारी तर हातात काहीच आणत नाहीत!
मग मीटिंगला सुरुवात होते. साधारणपणे पन्नास ते साठ टक्के उपस्थिती पाहिल्यावर साहेब चिडचिड करणार.. मग खालचे कर्मचारी त्यांच्या कर्मचारी सवंगड्यांना फोन करून बोलावण्याचा प्रयत्न करणार..नेमकं मीटिंगच्या दिवशीच दहा वीस टक्के लोक त्यामध्ये कोण आजारी पडणार( अगदी planning करून), कोण लग्नाला, कोण साखरपुड्याला, कोण अत्यंत जवळच्या पाहुण्याच्या मयतीला तर कोण दहाव्याला, कोण मिटींगला येताना गाडीवरून पडणार वगैरे वगैरे कारणं शोधून गायब. काही तर नेहमीप्रमाणे काहीच न सांगता गायब! नेहमी गायब असणाऱ्याना साहेबाने स्वतःच्या समाधानासाठी 2-3 नोटीस दिल्यावर ते एकदा मीटिंग ला येतात, साहेब खुश होतो पण पुढच्या मीटिंग ला ते पुन्हा गायब! .. एक तर साहेबाला त्याच्या साहेबाने मीटिंग मध्ये झापझाप झापल्यामुळे साहेबाला पण त्याच्या खालच्या कर्मचाऱ्यांची मीटिंग एकदम कडक घ्यायची इच्छा असते पण पाच पंचवीस टक्के लोक गैरहजर असल्यामुळे साहेबाचा प्लॅन fail जातो. मागच्या मीटिंग ला कोण कोण गैरहजर होत ते साहेब रागाने विचारतो पण ते कर्मचारी या मीटिंगला सुद्धा गैरहजर असतात त्यामुळे साहेब हा विषय इथंच सोडून देतो!(साहेबाला वाटतं विषय वाढवला तर बाकीच्यांना लक्षात येईल की साहेब नुसता दम देतो ,कारवाई काहीच करत नाही व त्यांचा पण confidence वाढून जे मीटिंग ला येतात ते पण मीटिंग ला यायचं बंद करतील!).
तरीसुद्धा साहेब एकदम कडक सुरुवात करतो! मीटिंग ला येताना साहेब अहवाल घेऊन यायला सांगतो पण जोपर्यंत साहेब विचारत विचारत नाही तोपर्यंत त्याच्या पिशवीतून ते काय बाहेर निघत नाही! मग साहेबाने सांगितल्यावर त्यातले निम्मे अर्धे अहवाल देतात... पण साहेबाला मात्र सगळ्या लोकांचा म्हणजे जे मीटिंग ला आले नाही त्यांचा अथवा जे मीटिंगला येऊन पण अहवाल देत नाहीत त्या सगळ्यांचा अहवाल मात्र वरच्या साहेबाला द्यावाच लागतो(खालचे कर्मचारी गैरहजर राहतात, वेळेवर येत नाही ही कारणे खालचा साहेब वरच्या साहेबाला तर सांगूच शकत नाही!!).. मग साहेबाला असाच काहीतरी आकड्याचा झोल करून वरच्या साहेबाला द्यावा लागतो(साहेबाची अस करण्याची इच्छा नसते पण साहेबांचा नाईलाज असतो). साहेबाला 50 ते 60 विषयाचा आढावा घ्यायचा असतो पण एवढ्या लोकांचा पहिल्या विषयाचा आढावा घ्यायलाच पहिला तास दीड तास जातो. काही तंत्रस्नेही साहेब थोडस चांगलं planning करून projector वर सुद्धा मीटिंग घेण्याचा प्रयत्न करतो पण हे नाटक थोड्याच दिवसात बंद पडत. पहिल्या विषयाचा आढावा तसा कडक होतो. हॉल मधील वातावरण थोडंफार तापलेल असतंय .त्यात पुन्हा निम्म्या लोकांची उत्तर दोन दिवसात करून घेतो, online केलंय पण दिसत नाही वगैरे वगैरे( वरच्या साहेबाला साहेब असलीच उत्तर देतो , ही सवय साहेबाला इथूनच लागते).मग साहेब त्यांना ओरडतो हे अस चालणार नाही, मी कारवाई करील वगैरे वगैरे.
या पहिल्या एक दीड तासात साहेबाला अतिशय गंभीर मुद्रा धारण करावी लागते कारण साहेब नुसता थोडं हसला तरी मीटिंग मधला दम निघून जातो. एवढं सगळं सुरू असताना उशिरा येणाऱ्या कर्मचाऱ्यांची हळूहळू आवक सुरू असतेच(संघटनेला वाहून घेतलेले बहुधा उशिरा येतात). साहेब त्यातल्या काहींवर चिडतो पण मीटिंग च्या मूळ विषयाची link तुटते त्यामुळे साहेब उशिरा येणाऱ्याला हटकायच पण सोडून देतो! तसं तर सगळेच उशिरा येतात पण नेमकं किती वाजताच्या नंतर आलं म्हणजे उशिरा समजायचं हा यक्षप्रश्न कधीच सुटत नाही... मग दुसरा विषय ..त्याच्यात पण हीच अवस्था ...मीटिंग कितीही विषयावर असली तरी खालच्या कर्मचाऱ्याकडे तेच कागद, तीच डायरी( काहींना एक डायरी पाच पाच वर्ष संपत नाही!) . काही विचारलं की तेवढेच दोन पान उचकायचे काही तरी फेकायचं, सगळा वेळ मारून न्यायचा कार्यक्रम !! (अगदी साहेबासारखंच) . साहेब त्यानी सांगितलेलं कुठं तरी लिहून घेतो जे त्याला पुन्हा कधीच सापडत नाही, पण सगळं नोंद घेतल्यासारखं दाखवावं लागतं. या खालच्या कर्मचार्यांचा basic problem हा असतो की ते नाही कशालाच म्हणत नाहीत आणि करत पण काहीच नाहीत ! अशा पद्धतीने पहिल्या एक दोन तासात 2-3 विषय संपत नाही तोच जेवणाची वेळ होते. मग जेवणाची सुट्टी!! अर्धा तासाची सुट्टी म्हणजे सगळ्यांनी एक तास गृहीत धरलेला असतोच! त्यात पण साहेबावर विश्वास असलेले तथा साहेबाची पोथी ओळ्खलेले दुपारीच गायब होतात.
मग पुन्हा बैठक सुरू होते, साहेब meeting ला आल्यानंतर मग लोक मीटिंग ला बसून घ्यायला सुरुवात करतात. काही VIP कर्मचारी तर थेट दुपारच्या सत्रातच meeting ला येतात!! मग अजून फार तर 2-3 विषयावर आढावा होतो(आढावा काही पण असो, उत्तर ठरलेलीच..दोन दिवसात करतो वगैरे वगैरे..).. आता मीटिंगला बऱ्यापैकी पठारावस्था प्राप्त झालेली असते..सगळ्या विषयात अतिशय सुमार दर्जाचा परफॉर्मन्स असल्यामुळे उर्वरित विषयातील कोणता विषय आधी घ्यावा ते साहेबाला समजत नाही. तरी पण आळीपाळीने झपाझापिचा कार्यक्रम सुरूच असतो. त्यातली त्यात प्रोटोकॉल, कमिटी असल्या कार्यक्रमात 'सहकार्य' न करणार्यांना साहेब जरा जास्तच झापतो(दुसरं करणार तरी काय?...)
बरेच विषय आढावा घ्यायचे बाकी असतात, ओरडू ओरडू साहेबाचा घसा दुखायला लागतो... पण विषय संपतच नाही... मग शेवटी बैठक आटोपती घ्यावी लागते..बहुतांशी विषयाला हात पण लागलेला नसतो...एवढा वेळ बैठक घेऊन साहेबाला मात्र समाधान वाटत नाही पण इलाज नसतो. उर्वरित विषय साहेब अक्षरशः फक्त वाचून दाखवतो, आता ह्या राहिलेल्या विषयात खालचे काय दिवा लावणार ते साहेबाला माहितीच असतंय तरी साहेब भोळी अपेक्षा ठेऊन सूचना देत असतो...सायंकाळी पाच साडेपाच वाजता बऱ्यापैकी चुळबुळ सुरू होते... घरी जायची घाई!! साहेब सोडून शक्यतो कोणी मुख्यालयी राहत नाही कारण मुख्यालयी फक्त साहेबानेच राहायचं असतंय हे ठरलेलं! कारण बाकीच्या सर्वांना चांगल्या सोयीसुविधा पाहिजे असतात , त्या मुख्यालयी असतीलच असे नाही... पण साहेब बिचारा adjust करून घेतो! अशा प्रकारे मीटिंग ची सांगता होते.. खालच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तथा फेकलेल्या आकड्यांच्या आधारे साहेब त्याचा report तयार करतो...तेच वरच्या साहेबाला फेकतो... असच वरचा साहेब पण..
- गोविंद खामकर
No comments:
Post a Comment