Tuesday, March 30, 2021

साहेबाची बदली

साहेब हा एक भटका प्रवर्ग आहे( Gypsy). साहेबाची इच्छा असो अथवा नसो,ठरलेला कालावधी पूर्ण झाल्यानंतर शासन  बदली करणारच! एकीकडे शासन स्थलांतर थांबविण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असताना साहेब कम्युनिटीला असं  जाणीवपूर्वक शासन निर्णय काढू काढू भटकं  करणं कितपत योग्य आहे?( साहेबांचं काम नाही पण किमान त्याच ठिकाण बदलून तरी साहेबाला फ्रेश करावं असा शासनाचा इरादा असावा!)सोयीच्या ठिकाणी बदली झाली नाही तर साहेबाला बरीच भटकंती करावी लागते. भटकंतीचे  दोन  तीन प्रकार आहेत. काही साहेब सहकुटुंब भटकंती करत फिरतात मग बदली कुठं का होईना. काही साहेब कुटुंब एका ठिकाणी ठेऊन स्वतः भटकत असतात, हे साहेब मुख्यालयातून शुक्रवारी दुपारी गायब होऊन सोमवारी दुपारपर्यंत मुख्यालयी प्रकट होतात. काही गृहप्रेमी साहेब शंभर दीडशे किलोमीटर दररोज  भटकून भटकून   घरी येतात, असले साहेब सकाळी 11:00 वाजता ऑफिस ला पोहचून सायंकाळी 4:00 वाजता ऑफिसमधून गायब होतात, या साहेबांची अर्धी जिंदगी प्रवासात बरबाद होते! (शिवाय प्रवासाने मणक्याच्या त्रास वगैरे हे सर्व additional benefits)...पण असो...

      साहेबाची टर्म पूर्ण होत आलेली असते बदलीचे वेध लागलेले असतात. काही साहेबांच्या अवगुणांमुळे किंवा  अतिचांगुलपणामुळे  त्यांची 'अवकाळी'  बदली सुद्धा होते. आता  बदलीचे दिवस तथा काहींच्या कंगालीचे दिवस तथा काहींचे सुगीचे दिवस जवळ येत असतात. साहेबांचं मन काही ऑफिसात रमत नाही(अगदी नेहमीप्रमाणेच!). जवळपास गेल्या तीन वर्षांपासून साहेबाचे त्याच्या कर्मचाऱ्यासोबतचे संबंध चांगलेच दृढ झालेले असतात.    कर्मचाऱ्यांचे लग्न, बारसे, वाढदिवस, जागरण गोंधळ , कंदूऱ्या ला जाऊन जाऊन साहेबाचे असे संबंध तयार झालेले असतात की  कर्मचाऱ्यांची चूक झाली असेल तरीसुद्धा साहेब कारवाई पण करू शकत नाही! साहेबांचा resistance पार संपलेला असतो! प्रकरण किती पण किचकट असलं तरी  नाय व्हय करीत शेवटी कोंबडा मारावाच लागतो.काही काही साहेब शेवटी शेवटी ओव्हर संपत आल्यामुळे स्कोर वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न करतात. त्यातली त्यात  शेवटचे सहा महिने तर साहेब सगळ्यांना काही पण  आश्वासन देत सुटतो, शंभर टक्के करून देतो ,नक्की करतो, थोडे दिवस थांबा, मी आहे ना चिंता करू नका वगैरे वगैरे. साहेबाच्या डोक्यात एवढंच की बदली होईपर्यंत चालढकल करायची आणि मग एकदाच सुटायचं!(बदली नाही झाली तर मात्र काय खरं नाही).  थोडक्यात बदली ही सुद्धा साहेबाची गरजच असते. काहींना मात्र आत्ता आहे ते ठिकाण चांगलंच 'मानवलेल' असतंय त्यामुळे ते टर्म संपली तरी तिथंच पाय रोवून बसण्यासाठी प्रयत्न करतात. काही साहेब जास्त भानगडीत न पडता कुठं तरी side posting ला बसून पेन्शन मिळण्याची वाट पाहत बसत असतात( फिल्ड वर काम केल्यावर पेन्शन मिळणं अवघड असतंय हे त्याना कुणीतरी सांगितलं असावं!! DCPS वाले पेन्शन ची  पण वाट पाहू शकत नाही!).
बरं बदली काय अशीतशी होत नसते. मुळात ते सुद्धा एक स्किल आहे. काही काही साहेब ज्यांच्यात हे स्किल नसतंय ते आयुष्यभर महाराष्ट्राच्या कडाकाठानेच भटकंती करत  राहतात. म्हणजे एकदा सिंधुदुर्ग की लगेच थेट गडचिरोली की लगेच नंदुरबार पुन्हा यवतमाळ अशा पद्धतीने.. जिकडे फेकील तिकडे!!!  काही काही साहेब मात्र दरवेळेस 'सोयीच्या आणि सायीच्या ' ठिकाणीच, एकदम reservation करून ठेवल्यासारखं!  काही साहेब नुसते वरच्या कार्यालयात(म्हणजे कुठे समजून घ्या) हेलपाटे मारतेत, तिथं  जातेत पण काही मेळच लागत नाही, मेळ लागला तरी 'समीकरण' न जुळल्यामुळे   संध्याकाळी ट्रेन पकडून गप   माघारी येतात. काही साहेब बदलीविषयी कोणाशीच काही बोलत नाही(एकदम आतल्या गाठीचे), कुठून सेटिंग लावली याची पण चर्चा करत नाहीत, एकदम सोंबडीत कार्यक्रम करून टाकतेत!  काही साहेब तर कहरच!! ते जिथं बदली पाहिजे तिथे प्रत्यक्ष मोक्यावर जाऊन स्थळनिरीक्षण करून येतात, सगळं 'व्यवस्थित' आहे ना याची सखोल चौकशी करून मग आकडा लावतात.(जनरली साहेब एवढा अभ्यास कधीच करत नाही!).काही साहेब मोठे वजनदार लोकं यांच्याशी 'बळच' जोडलेल्या संबंधाच्या आधारे याच पत्र घे,त्याच पत्र घे..आजारी नसलेल्याना बळच 'गंभीर' आजारी पाडून त्याच सर्टिफिकेट जोडून.... शर्तीचे प्रयत्न..पण तेवढ्यावर काय काम होत नाही!!
सगळे 'योग' जुळून आल्यावर एकदाची बदली होते! काही महाराष्ट्राच्या कडाकाठाने, काही सायीच्या  आणि सोयीच्या पोस्टिंग ला,  काही घराच्या जवळ वगैरे वगैरे. काहींच सगळं व्यवस्थित करून पण ऑर्डर मध्ये नावच नसतंय, यांची अवस्था बघण्यासारखी  असते!! 
आता साहेबांच मन एकदम कोऱ्या पाटीसारख झालेल असतंय, किमान जिथून चाललाय तिथलं तरी तो टेन्शन घेत नाही! साहेब जर अवघड क्षेत्रात काम करत असेल तर त्याला कार्यमुक्त होण्याचं challenge पार करावं लागतं,  त्यासाठी सुद्धा बराच आटापिटा करावा लागतो(काही unskilled  साहेब अवघड क्षेत्रात अडकून सेवानिवृत्त सुद्धा तिथंच होतात!). एकदाचा साहेब तिथून कार्यमुक्त होतो!
गेले तीन वर्षे साहेब जरी कुटुंबापासून दूर असला तरी तो सगळ्या कर्मचाऱ्यांना आपलं कुटुंब   समजून काम करत असतो. साहेबाला बऱ्याचदा त्याच्या व्यस्त कामकाजामुळे नातेवाईकाच्या लग्नाला, कार्यक्रमाला जायला जमत नाही मात्र साहेब हा कर्तव्यस्थानी सगळ्या कर्मचार्यांच्या सुखदुःखात सामील होतो. साहेबाच्या अडचणीच्या काळात सुद्धा हीच मंडळी घरातल्या मानसासारखी उभी असतात! साहेब आयुष्यभर हीच माणसं जोडत चालतो, हीच खरी साहेबाची कमाई !!(बाकी कमावलेले पुढच्या पिढीला ऐश करायला!!) कित्येक साहेबाच्या पोरांच्या लग्नात नातेवाईक कमी आणि हीच 'कुटुंबातील' मानस जास्त दिसतात(ही शंभर टक्के वस्तुस्थिती आहे). हे सर्व सोडून जाताना कोणत्याही साहेबाचे पाय जड होतात, कार्यालयातुन जरी साहेब कार्यमुक्त झाला तरी कर्मचार्यांच्या ऋणातून तो कधीच कार्यमुक्त होऊ शकत नाही!! साहेबांवर जीवापाड प्रेम आणि आदर असलेल्याना तर साहेबाची बदली पचविणे चांगलंच जड जात...
आता या 'भटक्याला' आपला पाल उचलण्याची वेळ आलेली असते. नवीन पोस्टिंग च्या ठिकाणी पाल कुठं मारायचा ते पुढचे 'कुटुंबीय' ठरविण्याच्या कामाला कधीच लागलेले असतात.आता साहेब पुन्हा एकदा नवीन ठिकाणी 'नवीन साहेब' होण्याच्या तयारीत रवाना होतो...मग पुन्हा बदली... पुन्हा तेच.... क्रमशः
© गोविंद  खामकर

No comments:

Post a Comment

प्रोटोकॉल

लेख 25 वा: प्रोटोकॉल ( 'साहेब सिरीज मधील यापूर्वीचे सर्व 24 लेख https://gamatijamati.blogspot.com या लिंक वर उपलब्ध आहेत) प्रोटोकॉल ह एक...